पारनेर

पार्श्वभूमी :

भूतकाळातील मराठीच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा -
एखादी भाषा नेमकी केव्हा अस्तित्वात आली हे सांगणं कठीण आहे. पण तिच्या अस्तित्वाच्या खुणा किती मागच्या काळापर्यंत शोधता येतात ह्याचा शोध इतिहासकार घेत असतात.
उद्योतनसूरी ह्या आठव्या शतकातल्या ग्रंथकाराच्या ‘कुवलयमाला’ ह्या ग्रंथात मराठे आणि मराठी ह्यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. (तुळपुळे, १९७३ पृ. ५)

दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य
दिण्णले गहिल्ले उल्लेविरे तत्थ मरहट्टे


त्यात धिप्पाड, सावळ्या, काटक, काहीशा अहंकारी अशा मराठ्यांचा (मरहट्टे) उल्लेख येतो तसेच ते ‘दिले, घेतले असं बोलतात’ (दिण्णले गहिल्ले) असे म्हणताना त्यांच्या भाषेचाही उल्लेख येतो. इ.स. ८५९ मधल्या धर्मोपदेशमालेतही मरहट्ट असं भाषेचं नाव आलं आहे. मराठीच्या अस्तित्वाविषयीचे हे अप्रत्यक्ष पुरावे आहेत. इ.स. १०६० मधल्या दिवे आगरच्या ताम्रपट मराठीचं अस्तित्व ओळखता येईल इतपत महत्त्वाचे उल्लेख आढळतात. (तुळपुळे, १९७३, पृ. ५-६)


यादवकाळ : लोकभाषेचा वैभवकाळ -
मराठीच्या अस्तित्वाविषयीचे सर्व तुरळक उल्लेख पाहत आपण यादवकाळात आलो की मराठीचं ठळक चित्र रेखाटता येऊ लागतं. अर्थात पूर्वी भाषा नोंदवण्यासाठी मुद्रण, ध्वनिमुद्रण इत्यादी साधनं उपलब्ध नव्हती. त्यामुळे आपल्याला मुख्यत्वे लिपिबद्ध झालेल्या भाषांविषयीचीच थेट साधनं आढळू शकतात. महानुभाव पंथाचं साहित्य म्हणजे यादवकालीन मराठी भाषेच्या अभ्यासाचं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे.

मराठी ही महानुभाव पंथाची धर्मभाषा होती. महानुभाव पंथाचे आचार्य श्री चक्रधरस्वामी हे जन्मले गुजरातेत. पण त्यांनी आपल्या शिष्यांना ‘महाराष्ट्री असावे’असा आदेश दिला आणि त्यांच्या शिष्यांनी तो आग्रहाने पाळला. ‘लीळाचरित्र’ ह्या इ. स.१२०० च्या सुमारास (कोलते, १९७८, प्रस्तावना पृ. ६५) रचलेल्या श्री चक्रधरस्वामींच्या महमिभट्टरचित चरित्रात केवळ चक्रधरस्वामींचंच नव्हे, तर यादवकाळातल्या मराठीच्या विविध आविष्काराचंही दर्शन घडतं. ‘काऊळेयाचे घर सेणाचे। साळैचे मेणाचे। पाऊसाळेया काऊळेयाचे घर पुरे जाय।...’’ ही लीळाचरित्रात आढळणारी काऊचिऊची गोष्ट आजही मराठी घरांत लहान मुलांना सांगितली जाते.

महानुभावांनी महाराष्ट्राच्या सीमा ठरवताना मराठी भाषेचा निकष म्हणून वापर केलेला आढळतो. तसंच मराठीच्या प्रांतपरत्वे होणार्‍या भाषाभेदांचीही त्यांना जाणीव असलेली दिसते. पुढील मजकुरात ही जाणीव स्पष्ट होते.

‘‘देश भणिजे खंडमंडळ : जैसे फलेठाणापासीन दक्षिणेसी : मर्‍हाटी भाषा जेतुला ठायी वर्ते तेतुले एक मंडळ: तयासी उत्तरे बालेघाटाचा सेवट : ऐसें एक खंडमंडळ: मग उभे (उभय) गंगातीर तेंहि एक खंडमंडळ : आणि तयापासौनि मेघंकरघाट (मेहकर, जि. अकोला) तें एक खंडमंडळ तयापासौनिआवघे वराड तें एक खंडमंडळ : परि अवघीं मिळौनि महाराष्ट्रचि बोलिजे : किंचित् किंचित् भाषेचा पालट : भणौनि खंडमंडळे भणावी’’

(तुळपुळे, १९७३, पृ. २४)
ह्या काळात मराठी ही लोकभाषा म्हणून स्थिरावलेली दिसते. सार्वजनिक ठिकाणी आढळणार्‍या शिलालेखांची भाषा मराठी हीच असलेली दिसते. धर्माच्या क्षेत्रातही संस्कृत भाषेचा अभिमानी वर्ग ज्ञानाची भाषा ही संस्कृतच असल्याचे सांगत असता दुसरीकडे मात्र लोकभाषा हेच आपल्या उपदेशाचं माध्यम म्हणून वापरणारे विविध धर्मपंथ ह्या काळात उदयाला आलेले दिसतात. नाथ, महानुभाव, वारकरी, दत्त ह्या पंथांच्या अनुयायांनी मराठी विविध प्रकारे समृद्ध केलेली दिसते.

नाथपंथाची परंपरा लाभलेल्या ज्ञानदेवांनी ज्ञानेश्र्वरी रचताना मराठी भाषेविषयी आपल्याला वाटत असलेला आत्मविश्र्वास व्यक्त केला आहे.

माझा मर्‍हाटाचि बोलु कवतिके। परि अमृतातेंहि पैजासि जिंके।
ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन।।


ही प्रतिज्ञा ज्ञानदेवांनी अक्षरश: खरी केलेली आढळते. त्यांनी आपला अमृतानुभव हा स्वतंत्र सिद्धान्त मांडणारा ग्रंथही मराठीतच रचून मराठी ही केवळ लोकभाषाच नव्हे, तर ज्ञानभाषाही आहे हे सिद्ध केलं आहे. ज्ञानदेव आणि त्यांची भावंडं, नामदेव, जनाबाई, चोखामेळा, सावता माळी, गोरोबा कुंभार ह्या सर्व वारकरी संप्रदायातील संतांनी आपल्या अभिव्यक्तीचं स्वाभाविक माध्यम म्हणून मराठीचाच वापर केल्याचं आढळतं. ह्या दृष्टीने पाहता यादवकाळ हा मराठीचा उत्कर्षाचा काळ आहे असं सार्थपणे म्हणता येतं.

परचक्र -
इ.स. १२९६ ह्या वर्षी महाराष्ट्रावर अलाउद्दीन खिलजी ह्याने स्वारी केली आणि यादवांचा पराभव केला (मेहेंदळे, १९९६, पृ. १०९). इ.स. १३१५ च्या दरम्यान यादवसत्तेचा अस्त झाला (मेहेंदळे, १९९६, पृ. १११) आणि पुढच्या काळात महाराष्ट्र काही शतकं विविध सुलतानांच्या आधिपत्याखाली होता. ह्या काळात प्रशासनात प्रामुख्याने फारसी, अरबी ह्या भाषांचा वापर होऊ लागला. सर्वसामान्य लोकांशी संपर्काचं माध्यम म्हणून मराठीचा वापर होत असला, तरी ह्या मराठीवर फारसीचा प्रचंड प्रभाव पडलेला आढळतो. मराठीत प्रचंड प्रमाणात फारसी शब्दांचा समावेश ह्याच काळात झालेला आढळतो.

मात्र धार्मिक व्यवहारात संस्कृताचं प्राबल्य टिकून होतं. संत एकनाथांच्या लिखाणात त्यांनी ‘संस्कृत भाषा देवे केली। प्राकृत काय चोरापासौन झाली।।’’


असा प्रश्र्न विचारलेला आढळतो ह्यावरून धार्मिक व्यवहारात मराठीच्या वापराला संपूर्णपणे प्रतिष्ठा लाभलेली नव्हती असं दिसतं. मात्र नाथांनी आणि अन्य वारकरी संतांनी लोकभाषेचा पुरस्कार सोडलेला दिसत नाही. दासोपंतांसारखा कवी अर्थाच्या अभिव्यक्तीत संस्कृतापेक्षा मराठीच अधिक समृद्ध आहे असा युक्तिवाद करताना आढळतो, तो पुढीलप्रमाणे...


संस्कृते घटु म्हणती । आतां तयाचे भेद किती।
कवणा घटाची प्राप्ती। पावावी तेणें?
हारा, डेरा, रांजणु। कैसी?...
ऐसे प्रतिभाषे वेगळाले। घट असती नामाथिले।
एकें संस्कृतें सर्व कळे। ऐसें कैसेन? (महाराष्ट्र - गाथा, पृ. २८)

मराठीच्या लिप्या -
ह्या काळात मराठी भाषा लिहिण्यासाठी दोन वेगवेगळ्या लिप्यांचा वापर होत असलेला आढळतो. एक म्हणजे बाळबोध किंवा देवनागरी लिपी आणि दुसरी लिपी म्हणजे मोडी लिपी. मोडी लिपी ही हेमाडपंत ह्या यादवांच्या प्रधानाने शोधली असं एक मत आहे. तर काहींच्या मते मोडी हे देवनागरीचंच शीघ्र लेखनासाठी वापरायचं रूप आहे. मोडीचा वापर मुख्यत्वे प्रशासकीय व्यवहारात होत असलेला दिसतो.

मराठीला रोमीतून (रोमन) मुद्रणसंस्कार -
ह्याच काळात युरोपीय ख्रिस्ती धर्मप्रसाराकांनी आपल्या धर्मप्रसारासाठी मराठी भाषेचा अवलंब केलेला आढळतो. इथल्या नव्याने ख्रिस्ती होणार्‍या लोकांकरिता त्यांच्या भाषांतून धर्मपुस्तके पुरवावीत ह्यासाठी मराठीतून लेखन झाले. धर्मप्रसारासाठी इथे येणार्‍या आपल्या धर्मबांधवांना इथल्या भाषा शिकता याव्यात ह्यासाठी मराठीविषयी त्यांनी आपल्या भाषांतून रचना केल्या. फादर स्टीफन्स ह्यांनी लिहिलेलं ओवीबद्ध मराठी ‘‘क्रिस्तपुराण’’ रोमी (रोमन)लिपीतून इ.स. १६१६ ह्या वर्षी रायतूरला छापलं गेलं. त्याच्या गद्य प्रस्तावनेत फादर स्टीफन्स म्हणतात. ‘‘हे सर्व मराठी भासेन लिहिले आहे. हेआ देसिंचेआ भासांभितुर ही भास परमेस्वराचेया वस्तु निरोपुंसि योग्ये एसी दिसली म्हणउनु’’ (मालशे पृ. ४२) त्यांनीच ‘‘आर्त द लिंग्व कानारिम्’’ हे मराठीच्या कोकणी बोलीचं व्याकरण पोर्तुगाली भाषेत लिहिलं. ते इ. स. १६४० ह्या वर्षी मुद्रित झालं.



शिवकाल :
शिवकाल : राजभाषेचं सौख्य -

छत्रपती शिवाजी महाराजांनी शके १५६२ (इ.स.१६४१-४२) ह्या सुमाराला आपला स्वराज्यस्थापनेच्या कार्याचा आरंभ केला आणि पुढील काळात त्याला यशही आलं. शिवकालात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवहाराची भाषा अर्थातच मराठी होती. त्या काळात अन्य राजवटींत राज्यकारभाराची मुख्य भाषा फारशी ही होती. शिवकालीन मराठीवरही फारशीचा प्रचंड प्रभाव असलेला दिसून येतो. मुजुमदार, सरनोबत, हवालदार इत्यादी अधिकार्‍यांची नावं, पीलखाना, जवाहरखाना आदी विभागांची नावं आणि सुत्तरनाल, तोफ इ. शस्त्रांची नावं असे अनेक फारसी शब्द मराठीत आले होते. अर्थात शिवकालात झालेल्या पद्यमय साहित्यव्यवहारात मात्र फारशीचा प्रभाव तितका जाणवत नाही.

ह्या पार्श्र्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने ह्या फारशी शब्दांना संस्कृत प्रतिशब्द देणारा राज्यव्यवहारकोश रचला गेला. शिवाजी महाराजांच्या अधिकार्‍यांच्या मुद्रा ह्या काही अपवाद वगळता मराठी वा संस्कृतातच होत्या (मेहेंदळे, १९९६, पृ. ६४०). शिवकाळात राज्यव्यवहार मुख्यत्वे मराठीत होताना आढळतो.

इंग्रजांकडून मराठ्यांकडे जी लेखी करारपत्रं वगैरे जात ती मराठीतच असत. मराठ्यांकडून इंग्रजांना जाणारी काही पत्रं तरी मराठीत असावीत असं अनुमान करायला वाव आहे. चौलचा सरसुभेदार बहिरोपंत ह्याने मुंबईचा गव्हर्नर हेन्री ऑक्झिंडेन ह्याला पाठवलेलं पत्र मराठीत होतं आणि नंतर त्याचं भाषांतर करण्यात आलं अशी माहिती आढळते. (मराठी संशोधनपत्रिका, जानेवारी, १९५४, पृ. १३)

शिवकालात आणि त्यानंतरच्या काळात गद्य मराठी भाषेवर फारशीचा काही एक प्रभाव आढळतो. ह्या दृष्टीने बखरींची भाषा पाहण्यासारखी आहे.

पेशवेकाळात राज्यव्यवहाराची भाषा मराठीच होती. तिच्यावर फारशीचा प्रभावही असलेला दिसून येतो. ह्या काळात मराठी सरदारांची संस्थानं महाराष्ट्राबाहेर निर्माण झाली. त्या भागांत मराठी भाषिक जनतेचं वास्तव्य होऊ लागलं, त्यातून त्या-त्या ठिकाणी मराठी भाषेचा प्रसार झाला.

ब्रिटिशकाळ :

मिशनरी आणि मराठी मुद्रणाचा आरंभ -
भारतात धर्मप्रसाराच्या हेतूने आलेल्या विल्यम केरीसाख्या इंग्रज धर्मोपदेशकांनी कोलकत्यापासून उत्तरेला १५ मैलांवर असलेल्या श्रीरामपूर ह्या ठिकाणी मिशन आणि मुद्रणालय स्थापन केलं. केरीने आपल्या पदरी असलेल्या वैजनाथ ह्या मराठी पंडिताच्या साहाय्याने १८०५ च्या मार्च महिन्यात आपलं ‘मराठी भाषेचे व्याकरण’ देवनागरीत छापून प्रसिद्ध केलं. ते मराठीतलं देवनागरी लिपीतलं पहिलं मुद्रित पुस्तक ठरतं. नंतर श्रीरामपूर मिशननं आणखीही मराठी पुस्तकं छापली. ती मोडी लिपीत छापली. कारण मराठीची लिपी ही मोडीच आहे अशी त्यांची समजूत होती. १८१७ ह्या वर्षी अमेरिकी मिशनरींनी मुंबईत ‘‘मात्थीउकृत शुभवर्तमान’’ प्रसिद्ध केलं हे मुंबईत छापलेलं पहिलं मराठी पुस्तक असावं. ह्या मिशनरींनी मुंबईत मराठी आणि गुजराती ह्या भाषांत शिकवणार्‍या शाळा काढल्या.

इंगजी राजवट : राजभाषापदाला ग्रहण -
इ.स. १८१८ ह्या वर्षी पुण्यातील शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकू लागला. नव्या परकीय शासनाची राजवट सुरू झाली. अर्थातच त्यात जेत्यांच्या भाषेला प्राधान्य मिळू लागलं. इंग्रजी ही प्रशासकीय कामकाजाची मुख्य भाषा बनली. इंग्रजी राजवटीसोबत शिस्तबद्ध प्रशासन आलं. इतर सार्वजनिक सुविधा आल्या.

इंग्रजांनी ह्या देशात अनेक नव्या गोष्टी आणल्या. त्यांपैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे औपचारिक शिक्षणपद्धती. मुंबई इलाख्याचा पहिला गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन याने दिनांक २१ ऑगस्ट, १८२२ ह्या दिवशी जगन्नाथ शंकरशेट, धाकजी दादाजी, मकबा इ. मुंबईतील नागरिक पुढार्‍यांच्या साहाय्याने ‘मुंबईची हैंदशाळा आणि शाळापुस्तकमंडळी’ ह्या नावाची संस्था काढली. ह्या मंडळीने १८३५ पर्यंतच्या १०-१२ वर्षांत विविध शालोपयोगी ग्रंथ मराठीत तयार केले (माडखोलकर, १९५४ पृ. २१-२३). मोल्स्वर्थचा ‘‘मराठी कोश’’ आणि दादोबा पांडुरंग ह्यांचं ‘‘महाराष्ट्र भाषेचे व्याकरण’’ ही ह्या पुस्तकांतली काही उदाहरणं. ह्यातून निर्माण झालेल्या मराठीच्या धाटणीला महामहोपाध्याय द. वा. पोतदार ह्यांनी ‘मराठी गद्याचा इंगजी अवतार’ असं म्हटलं आहे.

मराठी गद्याचा इंग्रजी अवतार -
ह्या काळातल्या भाषेवर इंग्रजीची छाप असणं स्वाभाविक होतं. जुन्या मराठीत दंड, विसावा (महानुभावीय साहित्य) अशी काही मोजकी विरामचिन्हं वापरत. इंग्रजीतली विरामचिन्हं मराठीतही आता वापरात आली. शब्दसंग‘ह पाहिला तर लिहिणारे लोक संस्कृत शास्त्रीपंडित असल्याने त्यांच्या भाषेवर संस्कृताचा आणि फारशीचाही फार प्रभाव आढळतो. ‘प्रभाकर’ नियतकालिकाच्या दिनांक २६ मार्च, १८४८ ह्या अंकातील हा उतारा पाहा.

‘‘पुण्यासारखे शहरांत विद्याशाळा बर्‍याच आहेत. परंतु ग्रंथ वाचण्याची जागा अद्याप लोकांस माहीत नव्हती व तिचा उपयोग कोणा नेटिव्ह लोकांस माहीत नव्हता; परंतु सांप्रतचे गवर्नरसाहेब सर जार्ज क्लार्क यांणीं लोकांचे सुधारणेकडे लक्ष देऊन जज्जसाहेब हेनरी ब्रोन यास सुचविलें कीं, पुण्यांत लायब्ररी स्थापण्याचा बेत करावा.’’ (पोतदार, १९७६, पृ. २२६-२२७)

नव्या राजवटीत मराठीच्या पूर्वपरंपरेची आठवण राहिली नव्हती. ‘‘मराठी ही केवळ बोलण्याची भाषा आहे. गद्य किंवा पद्य ग्रंथकारांनी ती मुळीच संपन्न किंवा सुसंस्कृत केलेली नाही.’’, असं मत व्हान्स केनेडी ह्याने व्यक्त केलेलं आढळतं. (माडखोलकर, १९५४ पृ. ३३)

संस्कृत पाठशाळा -
श्रावणात ब्राम्हणांना दानधर्म करण्याची पेशव्यांची प्रथा बंद करून ‘‘दक्षिणा फंड’’ हा निधी एलफिन्स्टनने निर्माण केला. त्या पैशांतून १८२३ ह्या वर्षी पुण्यात संस्कृत पाठशाळेची स्थापना केली (कुलकर्णी अ. रा., २००४). त्या शाळेत मराठी आणि संस्कृत ह्या भाषा शिक्षणाचं माध्यम म्हणून वापरल्या जात (पाटणकर, १९८४). १८२८ ह्या वर्षी ह्या पाठशाळेत इंगजी शिक्षणाचीही जोड दिली गेली.

नियतकालिकांचा उदय -
१८३२ ह्या वर्षी मुंबईला बाळशास्त्री जांभेकर ह्यांनी ‘दर्पण’ हे मराठी - इंग्रजी साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केलं. त्यांनीच पुढे काढलेलं दिग्दर्शन, भाऊ महाजन ह्यांचं प्रभाकर इत्यादी नियतकालिकांतून व्यवहारोपयोगी अशा विविध विषयांवर लिहिलं जाऊ लागलं. ह्या काळातल्या मराठी भाषेची घडण ही मुख्यत्वे ह्या नियतकालिकांनी केली आहे.



माध्यमिक शिक्षणातून मराठीचं विस्थापन -
१८४० ह्या वर्षी स्थापन झालेल्या प्रांतनिहाय शिक्षण मंडळांपैकी (बोर्ड ऑफ एज्युकेशन) मुंबई इलाख्याच्या मंडळाचा अध्यक्ष आस्कीन पेरी ह्याने सर्वत्र शिक्षणाचं माध्यम हे इंग्रजी करण्याचा ठराव मांडला. त्याला कर्नल जर्व्हिस आणि तीन भारतीय सभासद ह्यांनी विरोध केला. ‘‘मध्य युगात युरोपात सर्व देशांत उच्च ज्ञान लॅटिन ह्या भाषेतच दिले जात होते. त्यामुळे सामान्य जनता त्या ज्ञानाला पारखी होत असे. पुढे सर्व शाखांतील ज्ञान त्या त्या देशाच्या भाषेत द्यावयाची प्रथा पडली. ह्याचा परिणाम असा झाला की, उच्च ज्ञानाचे झरे सामान्य जनांपर्यंत पोहोचले. त्या इतिहासापासून काहीच धडा न घेता मूठभर इंजांनी आपली मातृभाषा लक्षावधी भारतीयांवर लादायची काय?’’ (पाटणकर, १९८४ पृ.५), असा प्रश्र्न जर्व्हिस ह्यांनी विचारला होता. पेरीने हट्टाने आदेश काढून चवथी ते सातवी (तत्कालीन मॅट्रिक) ह्या वर्गात मराठी वगळता अन्य सर्व विषयांच्या शिक्षणाचं माध्यम इंग्रजी हे केलं आणि ही व्यवस्था पुढे १०० वर्षे तशीच राहिली (पाटणकर, १९८४ पृ. ६).

उच्च शिक्षणातून मराठीचं उच्चाटन -
१८५७ ह्या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हा मराठी हा विषय वैकल्पिक म्हणून मॅट्रिक ते एम. ए. ह्या सर्व परीक्षांना घेता येत असे. दि. १८ नोव्हेंबर, १८६२ ह्या दिवशी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू अलेक्झॅण्डर ग्रांट ह्यांनी मॅट्रिकनंतर केवळ अभिजात (संस्कृत, लॅटिन इ.) भाषांचाच समावेश अभ्यासक्रमात असेल असा ठराव मांडला. डॉ. विल्सन ह्यांनी ह्या ठरावाला विरोध केला. पण १८६४ ह्या वर्षापासून मराठीचं उच्च शिक्षणातून उच्चाटन झालं. (पाटणकर, १९८४ पृ. ९-१४)

सामाजिक मंथनाचं माध्यम -
मात्र समाजसुधारकांनी, विचारवंतांनी वैचारिक मंथनासाठी मराठीचाच अवलंब केलेला आढळतो. विविध ज्ञानविस्तार, ज्ञानोदय, प्रभाकर इ. नियतकालिकांनी ह्यात फार मोठी कामगिरी केली. महात्मा फुले, मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर, 'सुधाकर' कार आगरकर, लोकमान्य टिळक ह्या लोकनेत्यांनी आपल्या लोकसंवादाचं साधन म्हणून मराठीचाच अवलंब केलेला दिसतो. स्वातंत्र्याची चळवळ हळूहळू आकारास येत होती. त्यात भाषा हे स्वत्वाचं प्रतीक मानलं गेल्यानं स्वभाषेची समृद्धी हा एक महत्त्वाचा मुद्दा मानून त्यासाठी प्रयत्न झालेले आढळतात.
इंग्रजी वाङ्मयाच्या प्रभावाखाली मराठी वाङ्मयाची नवी परंपरा आकार घेत होती. कादंबरीसारखा नवा वाङ्मयप्रकार ह्याच काळात उदयाला आला. मराठी वाङ्मयाचं क्षेत्रं ह्या काळात विस्तारत असलेलं दिसतं.

न्यायमूर्ती रानडे ह्यांचे प्रयत्न -
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ह्यांनी देशी भाषांचा विद्यापीठांत समावेश झाल्यास त्यांत अधिक चांगली पुस्तकं तयार होतील, अशी सूचना रजिष्ट्रार ऑफ नेटिव्ह पब्लिकेशन्स ह्यांच्याकडून करवून विद्यापीठाच्या कार्यकारिणीत चर्चा घडवून आणली. तिथे बहुमत मिळत नाही असं पाहून एम. ए., एम.डी. (वैद्यकीय), एल. एल. बी. ह्या परीक्षेत विद्यार्थ्यांना त्या त्या विषयावरील एक प्रबंध मातृभाषेत लिहिण्याची अट घालावी असा प्रस्ताव मांडला. पण तो मान्य झाला नाही. शेवटी न्यायमूर्तींच्या निधनानंतर १३ व्या दिवशी - दि. २९ जानेवारी, १९०१ ह्या दिवशी - वाईल्स ह्यांच्या प्रयत्नांतून एम. ए. ला विकल्पाने मराठी वाङ्मय ह्या विषयाची प्रश्र्नपत्रिका सुरू झाली. मात्र प्रश्र्नपत्रिका इंग्रजीत असणार होती आणि उत्तरंही इंग्रजीतच लिहिण्याचं बंधन होतं. अर्थात मॅट्रिक ते एम.ए. ह्यांच्या मधल्या पातळीवर मराठीचं अस्तित्व कुठेच नव्हतं. (पाटणकर, १९८४, पृ. २४-३३)

चवली-पावलीची सुधारणा -
१९२१-२२ पासून बी.ए. च्या परीक्षेला मराठीच्या दोन प्रश्र्नपत्रिका घेण्याची सवलत देण्यात आली. पण सन्मानासहित (ऑनर्ससह) बी.ए. होण्यासाठी मराठी घेता येत नसे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल मराठी न घेण्याकडे असे.


आधुनिक काळ :

ज्ञानभाषा बनवण्याचे प्रयत्न -
विद्यापीठात मराठीला प्रवेश नसला, तरी मराठी भाषा ज्ञानसमृद्ध व्हावी ह्या दृष्टीने समाजात विविध मंडळींनी प्रयत्न केलेला आढळतो. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर ह्यांनी १९१६ ते १९२७ ह्या कालावधीत ‘‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’’ हा ज्ञानकोश मराठीत निर्माण केला. सर्व स्तरांवर मराठीतूनच शिक्षण देणारी संस्था निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न विष्णु गोविंद विजापूरकर ह्यांनी केला. विविध व्यक्ती आणि संस्था ह्यांनी स्वभाषावृद्धीच्या हेतूने मराठी भाषेत मोलाचं वाङ्मय निर्माण केलं.

भाषाशुद्धीची चळवळ -
मराठीत आलेल्या फारशी आणि इंग्रजी शब्दांना पर्याय देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर, माधवराव पटवर्धन ह्यांनी भाषाशुद्धीची चळवळ उभारली. अनेकांनी ह्या चळवळीला विरोध केला असला तरी दिनांक, क्रमांक, विधिमंडळ, महापौर, नगरपालिका, नगरसेवक, संचलन, गणवेश, दूरध्वनी, टंकलेखन असे आजच्या मराठीत रुळलेले अनेक शब्द ह्या चळवळीनेच रूढ केले.

संयुक्त महाराष्ट्र : मराठी भाषकांच्या एकीकरणाचा प्रयत्न -
लॉर्ड कर्झनने केलेली बंगालची फाळणी बांग्ला भाषकांच्या आंदोलनामुळे १९११ ह्या वर्षी रद्द करण्यात आली. त्या संदर्भात केसरीत लिहिलेल्या लेखात न. चिं. केळकर ह्यांनी ‘‘मराठी भाषा बोलणार्‍यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी’’, अशी सूचना केली. (फडके, १९९७, पृ. ३५३) दिनांक ६ जानेवारी, १९४० ह्या दिवशी उज्जैनच्या साहित्य संमेलनात ग. त्र्यं. माडखोलकर ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एकभाषिक राज्याच्या मागणीचं आवाहन केलं. (फडके, १९९७, पृ. ३५५) ह्या एकीकरणाविषयी मतमतांतरं असली, तरी मराठी भाषकांचं एकीकरण व्हावं ह्या मागणीचा जोर वाढू लागला. ह्यातूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उदयाला आली. १९४६ च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र परिषद ही सर्वपक्षीय संघटना स्थापन करण्यात आली. १९२१ पासून कॉंग्रेस पक्ष भाषावार प्रांतरचनेचा पुरस्कार करत होता. पण स्वातंत्र्य जवळ येऊ लागताच हा प्रश्र्न अग्रक्रमाने सोडवण्याची निकड नाही असं नेहरू आदी ज्येष्ठ नेत्यांचं मत होतं. स्वातंत्र्योत्तर काळातही ह्या प्रश्र्नावरून बरंच मोठं आंदोलन होऊन दिनांक १ मे, १९६० ह्या दिवशी महाराष्ट्र हे एकभाषिक राज्य अस्तित्वात आलं. (संयुक्‍त महाराष्ट्रासाठीचा आंदोलनाची सविस्तर माहिती 'महाराष्ट्राविषयी विशेष-इतिहास' या विभागात दिली आहे.)
राजभाषा मराठी -
महाराष्ट्राचं भाषिक राज्य अस्तित्वात आल्यावर मराठी भाषा ही शिवकालानंतर पुन्हा राजभाषापदी विराजमान झाली. प्रशासनिक व्यवहारात मराठीचा वापर अनिवार्यपणे व्हावा असे आदेश निघाले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांच्या पुढाकारातून विविध व्यवस्था अस्तित्वात आल्या. इंग्रजीतून चालणारा राज्यकारभार मराठीतून चालवण्यासाठी ‘भाषामंडळाची स्थापना झाली आणि राजभाषा म्हणून मराठीच्या वापराची पूर्वतयारी करण्यासाठी ‘भाषा-सल्लागार-मंडळाची स्थापना झाली. २६ जानेवारी, १९६५ च्या गणराज्य दिनापासून ‘महाराष्ट्र-राजभाषा-अधिनियम’ अस्तित्वात आला. (कोलते, १९८९, पृ. ५२-५४)

शासकीय कार्यालयांच्या व अधिकारपदांच्या इंगजी संज्ञांचे मराठी पर्याय देणारा ‘पदनामकोश’ प्रकाशित झाला. १९७३ ह्या वर्षी ‘शासन-व्यवहार-कोश’ प्रकाशित झाला. विविध ज्ञानशाखांतील पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय सुचवणारे विविध कोश अस्तित्वात आले. ह्या कोशांच्या भाषेविषयी ‘ही दुर्बोध आणि संस्कृतप्रचुर आहे’, अशी टीकाही झाली. पण आज ह्या पारिभाषिक संज्ञा शासनव्यवहारात बर्‍याच प्रमाणात रुळलेल्या आढळतात. मराठी भाषा, मराठी संस्कृती ह्यांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने विविध संस्था, महामंडळं ह्यांची स्थापना करण्यात आली.

वर्‍हाडी, अहिराणी इ. मराठी भाषेच्या विविध बोली असून प्रांतपरत्वे भाषेच्या रचनेत भेद आहेत. मराठीच्या प्रमाणीकरणाच्या दृष्टीने मराठी-साहित्य-महामंडळाने मराठी शुद्धलेखनाची नियमावली १९७२ ह्या वर्षी तयार केली. शिक्षणव्यवहारात मराठीचा समावेश माध्यमिक स्तरापर्यंत झाला. मात्र उच्च शिक्षणाच्या संदर्भात काही अपवाद वगळता सर्व विषय मराठीतून शिकण्या-शिकवण्याचे प्रयत्न फारसे झालेले दिसत नाहीत. शिक्षणाचं माध्यम म्हणून मराठीचा पुरेसा विकास झाला नाही. तिला तशी संधीच फार कमी लाभली. मात्र मराठी वाङ्मय हा विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिकण्याचीही सोय उपलब्ध झाली. चित्रपट, नाटक, वाङ्मय अशा क्षेत्रांत मराठी भाषेतल्या कलाकृतींचा दबदबा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात ही माध्यमं आपल्या परीने समृद्ध परंपरा निर्माण करत आहेत.


आव्हाने व आशा :

‘जरी आज ती राजभाषा असे’ -

मराठी ही आज महाराष्ट्राची राजभाषा आहे. मात्र तिला अनेक कारणांमुळे तिचं उचित स्थान लाभलेलं नाही अशीही खंत अनेकांनी अनेकदा व्यक्त केलेली आढळते.

न्यायव्यवहारात अद्याप इंग्रजी भाषेचंच अधिराज्य आढळतं. मराठीत न्यायव्यवहार व्हावा ह्यासाठी आंदोलनं करावी लागत आहेत. १९९५ पासून आंदोलनं झाल्यावर शासनाने १९९८ ह्या वर्षी त्याविषयीची अधिसूचना काढली आणि २००० ह्या वर्षी उच्च न्यायालयाने परिपत्रक काढून खालच्या न्यायालयातील किमान ५० टक्के कामकाज मराठीत झालं पाहिजे असा आदेश दिला. मात्र मराठी हीसुद्धा उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा व्हावी ही मागणी अद्याप पुरी झालेली नाही.

जागतिकीकरणाच्या रेट्यात इंग्रजीचं प्राबल्य असून शिक्षणव्यवहारातून मराठीचा वापर सर्वत्र होणं हे अजूनही एक स्वप्नंच आहे. इंग्रजीवाचून पर्याय नाही ही भावना पुन्हा बळावली आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या विद्यार्थ्यांच्या अभावामुळे उणावते आहे. समाजातला मोठा वर्ग आधीच इंग्रजी माध्यमाकडे वळला आहे. प्राथमिक शिक्षणातही मराठी टिकणार का हा प्रश्र्न निर्माण झाला आहे.

मराठीच्या दैनंदिन वापरात अनावश्यक इंग्रजी शब्दांचा वापर भरमसाठ वाढतो आहे. ‘‘वाइफ सिवियरली इन्जर्ड झाल्याने तिला अर्जंटली हॉस्पिटलाइज्ड करावं लागलं’’ अशी वाक्य सहज वाटू लागली आहेत. ह्याउलट ‘‘बायकोला मोठी दुखापत झाल्याने तातडीने रुग्णालयात ठेवावं लागलं’’, हे वाक्य परकं वाटू लागलं आहे. वृत्तपत्रं, दृक-श्राव्य प्रसारामाध्यमं ह्यांना मराठी मथळे सुचेनासे झाले आहेत. हे टाळून निव्वळ मराठी बोलण्या-लिहिण्याचा प्रयत्न हा स्वभाषकांनाही शुद्धिवादी, प्रतिगामी, हटवादी वाटू लागला आहे. मराठीतच नवे शब्द घडवण्याचा, वापरण्याचा कंटाळा वाढतो आहे. शब्द घडवलेच, तर ते संस्कृतप्रचूर आणि क्लिष्ट घडवले जात आहेत.

‘यशाची पुढे दिव्य आशा असे’ -

मात्र आजही मराठी हीच सुमारे सात कोटी लोकांच्या स्वाभाविक अभिव्यक्तीची भाषा आहे. भारतातली ६.९९ टक्के जनता मराठी भाषक आहे. भारतीय शासनाच्या सूचीतील प्रशासनिक भाषांपैकी मराठी ही भाषकसंख्येच्या दृष्टीने ४ थ्या स्थानावर आहे.

संगणकयुगात युनिकोडसारख्या प्रणालीने देशी भाषांचा संगणकावरील वावर सुकर केला आहे. महाजालावर मराठीचा वावर व वापर वाढला आहे, वाढतो आहे. भाषिक गटांच्या, त्यांच्या अस्मितांच्या प्रश्र्नाकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मराठी नव्या जगात आपल्या तेजाने तळपत राहील असा विश्र्वास लोकमानसात निर्माण होतो आहे.


 
web counter
संकेतस्थळ भेट क्र.
Copyright © 2013. Ahmednagarjilha.tk All Rights Reserved

Welcome to Ahmednagar district